तिरंगी झेंड्याचे आत्मवृत्त किंवा
मी राष्ट्रध्वज बोलत आहे !
महाविद्यालयाच्या आवारात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनासाठी आम्ही विद्यार्थी शिस्तीने रांगेत उभे होतो. प्राचार्यांनी ध्वजारोहण केले आणि दिमाखाने फडफडणाऱ्या राष्ट्रध्वजाने माझे मन वेधून घेतले. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर हा तिरंगा दिमाखाने फडकत होता. त्याच्याकडे पाहत असताना मला वाटू लागले की, जणू काही तो ध्वज माझ्याशी बोलत आहे.
"तू माझ्याकडे मोठ्या आदराने पाहतोस हे स्वाभाविकच आहे." राष्ट्रध्वज बोलत होता. "मी तुमचा मातृभूमीचे प्रतीक आहे. मी म्हणजेच भारत ! मला दिलेला सन्मान हा भारताचा सन्मान ठरतो. माझ्यामागे माझा उज्ज्वल इतिहास आहे. माझे आजचे हे रूप, आजचे हे स्थान सहजासहजी लाभलेले नाही. त्यासाठी मला फार मोठा कालचक्रातून जावे लागले. अनेक क्रांतिवीरांनी माझ्या सन्मानासाठी आपल्या प्राणांचे बलिदान केलेआहे. त्या वेळी माझ्या शूर सुपुत्रांची साथ मला सदैव लाभली.
'' १८५७ पासूनच भारतीयांनी आपल्या गुलामीचे जोखड फेकून देण्याचा प्रयत्न चालवला होता. इंग्रजांच्या बलाढ्य शक्तीशी ते प्राणपणाने टक्कर देत होते. भारत पारतंत्र्यात असताना भारतीयांना मी सदैव साथ व प्रेरणा देत होतो. प्रत्येक स्वातंत्र्य आंदोलनात मी अग्रभागी असे. माझ्या रक्षणासाठी माझ्यादेखत अनेक बहाद्दरांनी आपल्या रक्ताचा सडा शिंपला. त्यांची स्मृती म्हणून माझ्या अंगावर केशरी रंगाचा पट्टा आला. काळाच्या ओघात माझा चेहरामोहरा वेळोवेळी बदलत गेला. हिरव्या व केशरी रंगांमध्ये पांढरा पट्टा आला. कधी माझ्यावर 'वंदे मातरम्' ही अक्षरे लिहिली गेली, तर कधी सूर्य, कधी चंद्र, कधी कमळ अशी चित्रे काढली गेली. १९२० नंतर मी तिरंगा बनलो व त्या काळी स्वदेशप्रेमाचे प्रतीक असलेला चरखा माझ्या छातीवर अभिमानाने मिरवू लागलो. स्वातंत्र्योत्तर काळात मला 'राष्ट्रध्वज' होण्याचा मान लाभला, तेव्हा चरख्याची जागा सार्वभौम अशोकचक्राने घेतली.
'माझा केशरी रंग देशभक्ती आणि त्याग यांचे प्रतीक आहे; तर माझा पांढराशुभ्र रंग शांतताप्रियता आणि मांगल्यसूचक आहे तसाच हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निळे चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, हे राज्य धर्म, नीती आणि न्याय यांच्याच आधारे प्रगतिपथावर अखंड गतिमान राहील..
"मित्रा, आजवर अनेकांनी माझ्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सर्वांगावर लाठ्या झेलल्या, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या, तरी त्यांनी माझा कधी अवमान होऊ दिला नाही. हे स्वातंत्र्यसैनिक देशासाठी हसत हसत फासावर चढले तेही मला छातीशी कवटाळून! ते सारे रोमांचकारक सोनेरी क्षण आठवताच आजही माझे मन आनंदाने भरून येते.
१९४० साली १४ ऑगस्टच्या रात्रीनंतर मी जेव्हा ध्वजस्तंभावर डोलते विराजमान झालो तेव्हा भारतीयांच्या डोळयांचे पारणे फिटले. बाळा तू एक अभिमानाने व कुतूहलाने माझ्याकडे पहतोस म्हणूनच मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलते। आहे. नाहीतर आजचा युवक स्वतःच्याच विश्वात एवढा मश्गुल असतो की, त्याचे माझ्याकडे कधी लक्षही जात नाही. माझा सन्मान म्हणजे भारताचा पर्यायाने तुमचाच - सन्मान आहे, हे त्याच्या ध्यानीही येत नाही.
" पाहता पाहता आवाज़ बंद झाला; मी मात्र आमच्या महाविदयालयासमोरच्या चौकात ध्वजस्तंभावर डौलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज पाहून मनोमनी सुखावलो होते. नतमस्तक होऊन, राष्ट्रध्वजाला वंदन करून मी माघारी वळलो.
...मराठी निबंध !